Wednesday, April 22, 2026

*‘वऱ्हाड निघालं लंडनला’ चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय*

 *संदीप पाठक यांच्यावर मित्रांकडून प्रेमाचा वर्षाव*

वऱ्हाड निघालं लंडनला’ चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर टाळ्यांच्या कडकडाटात रंगलेला हा विशेष प्रयोग एका अनोख्या सरप्राईजमुळे अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला.

अभिनेता संदीप पाठक यांना त्यांच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. मिलिंद कुलकर्णी, निलेश चांडक, डॉ. सुशील मुगडिया, सुशील जेठलिया, अॅड. वर्षा मुंदडा, डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या संदीपच्या सर्व मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत, असा अनोखा अनुभव देणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेड कार्पेटसह केलेल्या या खास मांडणीमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले. रांगोळी, सनई-चौघडे आणि प्रेक्षकांना अत्तर लावून स्वागत अशा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं होतं. यावेळी केक कटिंगसोबतच शाल-श्रीफळ देऊन अभिनेता संदीप पाठक तसेच नाट्यनिर्माते संदीप सोनार आणि समीर हंपी या निर्मात्यांचा सन्मान करण्यात आला.

या अनपेक्षित सन्मानाने भारावलेल्या संदीप पाठक यांनी भावना व्यक्त करत सांगितलं, ‘आयुष्यात मी खरंच काही कमावलं असेल, तर ती माणसं आहेत. मित्र-मैत्रिणी, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या साथीनं हा प्रवास शक्य झाला. आजच्या धावत्या जगात असं मनापासूनचं सरप्राईज मिळणं म्हणजे आयुष्यभर जपण्यासारखी आठवण आहे’ प्रकाशझोतात दिसणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेक अनामिक हातांचा वाटा असतो, याची जाणीव करून देणारा हा सोहळा ‘वऱ्हाड निघालं लंडनला’च्या यशात आणखी एक सुवर्णक्षण ठरला.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी गाजवलेलं ‘वऱ्हाड’ हे एकपात्री नाटक गेली अनेक वर्षं मराठी रंगभूमीवर रसिकांचं मन जिंकत आहे. अभिनेता संदीप पाठक यांनी या नाटकाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवत महाराष्ट्रभर यशस्वी प्रयोग सादर केले आहेत. अस्सल मराठवाडी बोली, बावन्न व्यक्तिरेखांचा बहारदार आविष्कार, भिन्न आवाजांची रंगत आणि प्रचंड ऊर्जेनं साकारलेलं हे नाटक आजही तितकंच टवटवीत आणि प्रेक्षकप्रिय ठरत आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Union Minister Piyush Goyal Inaugurates Hunger Free World Initiative at Atal Bihari Vajpayee Kaushalya Vikas Kendra, Mumbai

  Union Minister Piyush Goyal Inaugurates Hunger Free World Initiative at Atal Bihari Vajpayee Kaushalya Vikas Kendra, Mumbai Mumbai | 9 Jun...