Friday, April 10, 2026

‘अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्यातून देणार खास संदेश*

 *नवीन प्रयोग, नवी भाषा - प्रभाकर मोरे यांची खास तयारी*

गेली अनेक वर्षे ‘हास्यजत्रा’त कोकणी व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते  प्रभाकर मोरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. ‘अबब विठोबा बोलू लागला’ या गाजलेल्या बालनाट्यात ते प्रथमच काम करणार असून पुजाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. यासाठी प्रमाण भाषेत संवाद साधण्याचं मोठं आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललं आहे. विविध विषयांवरील बालनाट्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता त्याच परंपरेला उजाळा देत, एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर धम्माल करायला सज्ज झालं आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक प्रशांत गिरकर ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचं दिग्दर्शन करत असून, त्यांच्या दिग्दर्शनातून या नाटकाला आधुनिक सादरीकरणाची जोड मिळाली आहे. जुन्या आठवणींना नवी झळाळी देत, विनोद आणि संदेश यांचा सुंदर मेळ घालणाऱ्या  या बालनाट्याचे  पुढील  प्रयोग १६ एप्रिल गुरु दु  ४:३० काशीनाथ घाणेकर, ठाणे १७ एप्रिल शुक्र स ११:३० प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली १७ एप्रिल शुक्र संध्या ७:३०  शिवाजी मंदिर, दादर  येथे होणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथे १० यशस्वी प्रयोग झाल्यावर मुलांच्या परीक्षे नंतर आता सुट्टीत महाराष्ट्रभर याचे प्रयोग होणार आहेत. १ ते ३ मे कोकण दौरा आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रभाकर मोरे यांनी सांगितलं, “प्रमाण भाषेत बोलणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. इतकी वर्षं कोकणी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर हा बदल सोपा नव्हता. त्यामुळे या नाटकासाठी मला अधिक वेळ देऊन मेहनत घ्यावी लागली. पण त्या प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळालं.” संस्कृती आणि परंपरेची सुंदर सांगड घालणारं हे बालनाट्य केवळ लहान मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांनाही अंतर्मुख करणारं ठरणार आहे. आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न या नाटकातून प्रभावीपणे करण्यात आला आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणार  ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे बालनाट्य लहान मोठ्या प्रत्येकाने आवर्जून बघावं, असं आवाहन  प्रभाकर मोरे यांनी यावेळी केलं.

कर्टेन रेझर एंटरटेनमेंट’ आणि ‘लिटिल थिएटर’ अर्थात‘बालरंगभूमी’या संस्थेकडून नीळकंठ नांदुरकर लिखित हे विनोदी नाटक नव्या संचासह प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकाचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. यापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या नाटकात काम करत त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांच्या अभिनयामुळे हे नाटक त्या काळात प्रचंड गाजलं होतं. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर या नाटकाला नव्या रूपात सादर करत आहेत.


या नव्या आवृत्तीत प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे ‘धम्माल पुजारी’च्या भूमिकेत असून  त्यांच्यासोबत सागर पवार, नीता दोंदे, निखिल केंजळे, प्रकाश अय्याळ, अजित सावरे, प्रेम औटि, आशिक चव्हाण, विरराज राजपूत, उन्नती शिंदे, बालकलाकार अबीर जोशी, गोजिरी जगदाळे, कियारा पाटील, श्रीजा पोटे, आयुष टेंबे, ध्रुव खानविलकर, सिद्धेश बरीदे, ओवी भुजबळ, मृगा जोशी नाटाकाची रंगत वाढवणार आहेत.

या नाटकाविषयी बोलताना  दिग्दर्शक प्रशांत गिरकर  सांगतात,  आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणजे ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे नाटक. हे नाटक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून, संस्कार आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ प्रेक्षकांसमोर मांडतं आजच्या धावपळीच्या जीवनात हरवत चाललेल्या मूल्यांची जाणीव करून देत, कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे नाटक करतं. विशेष म्हणजे, हे फक्त बालनाट्य नाहीतर मोठ्यांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांनी बालकांसोबत बालक होवून पहावे असे नाटक आहे. पालक आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट करण्यासाठी, संवाद वाढवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम  ठरेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.  


नाटकाचे नेपथ्य महेश साळगावकर तर संगीताची जबाबदारी आनंद ओक यांनी सांभाळली आहे. रंगभूषा स्वप्नील चिमणे,  प्रकाशयोजना केदार भोंडवे यांची आहे.  वेशभूषा काजल अटेलियर यांची आहे. निर्मिती व्यवस्था नरेंद्र  आंगणे यांनी सांभाळली आहे

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*IndiaFirst Life’s AI-Driven Transformation with Salesforce Agentforce*

  *IndiaFirst Life’s AI-Driven Transformation with Salesforce Agentforce* Building on its unified Salesforce foundation, IndiaFirst Life is ...