Saturday, February 14, 2026

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

 नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गाणे प्रेक्षकांच्या भेटीस 


‘तिघी’ या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांची गुंतागुंत आणि भावनिक प्रवास यांचा सखोल वेध घेणाऱ्या या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक संवेदनशील आणि भावस्पर्शी गाणे ‘शारदा सरिता’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, आई–मुलीच्या नात्याचा हळुवार आणि भावनिक प्रवास मांडणारे हे गाणे प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक मुलीसाठी खास ठरणारे आहे.

प्रतिभावान अभिनेता-कवी जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द अत्यंत काव्यमय असून निलेश मोहरीर यांनी दिलेल्या सुरेल आणि मृदू संगीतामुळे गाण्याला शांत, प्रवाही असा भाव लाभला आहे. तसेच प्रियंका बर्वे यांच्या आवाजाने या गाण्याला अधिक भावनिक उंची मिळाली आहे. शब्द, सूर आणि गायन यांचा सुंदर मेळ साधणारे ‘शारदा सरिता’ हे गाणे मनाला स्पर्शून जाते. आईच्या नजरेतून मुलीकडे आणि मुलीच्या मनातून आईकडे पाहाण्याचा कोमल भाव या गीतातून अनुभवायला मिळतो.

गीतकार जितेंद्र जोशी म्हणतात, ‘’ ‘शारदा सरिता’ लिहिताना शब्दांची जुळवाजुळव करण्यापेक्षा भावनांची जुळवाजुळव अधिक महत्त्वाची वाटली. हे गाणं मोठ्या, ठळक भावना मांडत नाही, तर हळूच मनात शिरणाऱ्या, आत खोलवर रुजणाऱ्या भावना सांगतं. आयुष्यातील नाती, त्यांची ताकद आणि स्वीकार यांचा एक प्रवाही अनुभव शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला. शब्द नदीसारखे वाहते असावेत, ही भावना मनात होती आणि त्यातूनच ‘शारदा सरिता’ आकाराला आलं.’’

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ‘’ ‘तिघी’ हा चित्रपट नात्यांच्या न बोलल्या जाणाऱ्या भावना आणि सूक्ष्म घालमेल टिपणारे आहे. ‘शारदा सरिता’ हे गाणं केवळ कथानकाचा भाग नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे. आयुष्यात येणाऱ्या शांत, तरीही खोलवर परिणाम करणाऱ्या क्षणांना हे गाणं स्वर देतं. विशेषतः आई आणि मुलीमधील नात्याची हळवी, मजबूत वीण या गीतातून अधिक अधोरेखित होते. या गाण्यामुळे प्रेक्षक पात्रांच्या मनोविश्वाशी अधिक घट्टपणे जोडले जातील, असा विश्वास आहे.”

‘तिघी’मध्ये भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...